कालचा दिवस माझ्या आयुष्यातला खूप वाईट दिवस होता. या दिवसाची सुरुवात एका सफाई कामगाराच्या पत्नीच्या निधनाने झाली होती. हा तोच सफाई कामगार जो गावाचं आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी गावची घाण काढत होता. पण त्याला त्याच्या पत्नीला कॅन्सर सारख्या रोगातून बाहेर काढता आलं नाही. त्याच्या पत्नीची ट्रीटमेंट सांगलीच्या गांधी हॉस्पिटल पासून मुंबईत टाटा हॉस्पिटल पर्यंत केली होती. माझ्या व माझ्या मित्र परिवाराकडून शक्य तेवढे प्रयत्न आम्ही केले होते. पण दोन वर्षांपासून चाललेली ही झुंज अखेर संपली आणि काल ती कायमची मुक्त झाली.
याच दिवसाची दुसरी घटना म्हणजे समाजातल्या एका व्यक्तीला चक्कर आली म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये घेऊन जाण्यात आलं होतं. विकनेस आला असल्यानं सलाईन लावण्यासाठी प्रयत्न केला असता डाॅक्टरांना त्याची हाताची शीर ही सापडत नव्हती. बी पी लेव्हल लो होत असल्याने त्यांना सांगलीच्या हॉस्पिटल मध्ये घेऊन जाण्यास सांगितलं गेलं होतं. पण त्यांच्या कुटुंबात निर्णयक्षम माणसं नसल्यामुळे त्यांना डॉकटरांच म्हणणं पटल नाही. जेंव्हा मी आणि माझा मित्र प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये त्यांना पहायला गेलो होतो. तेंव्हा डॉक्टरांनी सांगून दोन तास होऊन गेले होते. सकाळी चालत येऊन रिक्षात बसलेल्या पेशंटला आता उठून ही बसता येत नव्हतं. इतका विकनेस आला होता. पेशंट ची परिस्थिती पाहता आणि कुटुंबाची पेशंट बद्दलची आत्मीयता आणि नैराश्याची भुमिका पाहता मी आणि माझ्या मित्राने त्यांना सांगलीला न्यायचं ठरवलं. आम्ही त्या पेशंटला व्हीलचेअरवर बसवून ॲम्बुलन्स मध्ये नेताना पहीला अटॅक आला. पेशंटला अटॅक येत असताना मी त्यांची छाती जोर जोरात दाबत होतो. काही वेळात ते पुन्हा नॉर्मल स्थितीत आले. त्यांना पुन्हा व्हीलचेअरवर नीट बसवलं आणि डॉक्टरांना बोलावलं. डॉक्टर येई पर्यंत त्यांना दुसरा अटॅक आला. तेव्हाही त्याची छाती दाबत होतो पण तो त्यांचा शेवटचा अटॅक होता. त्याच अटॅक मध्ये पेशंट गेला. त्यांना व्हीलचेअरवर वरून पुन्हा बेडवर झोपवल. डॉक्टरांनी बीपी चेक केला. पेशंटच अंग पूर्ण थंड पडल होतं. जीव वाचवण्यासाठी पेशंटला ऍम्ब्युलन्सने सांगलीच्या हॉस्पिटल मध्ये घेऊन जात असताना स्ट्रेचर वर टाकून अँब्युलन्सने घरी न्यावं लागलं. या साऱ्या प्रक्रियेत पेशंटच्या घरचा एक ही व्यक्ती त्या पेशंटच्या आस पास ही नव्हता. असो. त्यानंतर तिसरा पेशंट. मग चौथा आणि नंतर पाचव्या पेशंटला भेटून रात्री एक वाजता घरी आलो. अशा या एका दिवसातल्या पाच वेगवेगळ्या पेशंट आणि घडलेल्या घटना.
एक माणूस जिवंत असल्यापासून मरेपर्यंत चा प्रवास मी काल काही वेळेत पाहिला आहे. माणूस जगत असताना खूप साऱ्या चुका करतो. व्यसन ही त्यातली एक महत्त्वाची चूक आहे. अस मला वाटत. समाजात बरेच लोक व्यसनाधीन झाले आहेत. समाजात अश्या व्यक्तींना एका वेगळ्याच दृष्टीने पाहिलं जातं. व्यसन करणारा प्रत्येक व्यक्ती हा वाईट नसतो. आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो हे खूप वाईट आहे. माझ्या घरात ही अशी व्यक्ती आहे. म्हणून ती व्यक्ती मरत असतानाही मी तिच्यासोबत न राहणं म्हणजे मी माणूस म्हणून जगण्याच्या लायक नाही.
आपल्या आजूबाजूला अनेक माणसं आहेत. ज्यांना दोन वेळचं अन्न ही मिळत नाही. जे छोट्या मोठ्या आजाराने त्रस्त आहेत. आर्थिक परिस्थतीमुळे ते उपचार ही घेऊ शकत नाहीत. यातली काही माणसं व्यसणाधीन नाहीत. तर काही व्यसणाधीन. जी माणसं व्यसनाधीन अधीन गेली आहेत. ती सारी माणसं जन्मजात व्यसनाधीन नाहीयेत. त्यांची परिस्थिती त्यांना व्यसनाकडे घेऊन गेली आहे. मी व्यसनाचा किंवा व्यसनाधीन माणसाचं समर्थन करत नाही. पण आपण आपल्या संवेदना जागृत ठेऊन अश्या ही व्यक्तीच्या मदतीला जायला हवं. तर आपण माणूस म्हणून जगायला पात्र आहोत. असं माझं प्रामाणिक मत आहे.
- के.प्रफुल्ल