Tuesday, 24 September 2019

लगीनघाई

आईच्या टेन्शनमुळे लग्नाच्या विषयावर खूप दिवस झाले विचार करतोय. तिच्या म्हणण्यानुसार तिन चार मुली हि पाहिल्या होत्या. पण एकीने केस दाढी पाहून नकार दिला. दुसरीला आणि तिच्या घरच्यांना मी करत असलेले काम आवडलं नाहीचं आणि जे काम करतोय त्याच्यावर विश्वास बसत नाही म्हणून तिनेही नकार दिला. मुलीना काय आवडेल आणि काय नाही हे सांगता येत नाही. एका मुलीने मी गणपतीची पूजा करणार नाही म्हटल्यावर लगेच तिचा मेसेज आला. 'sorry. I am not interested to marry with u' मी रिप्लाय दिला Thanks. बर देवाचा विषय होता म्हणून ठिक. नाहीतर i am not virgin. मी sexually experienced आहे. ते हि पाच वर्षापूर्वी पासूनचं. हे जर वाक्य माझ्या तोंडून गेलं असतं तर तिने काय केल असतं काय माहित. आजकाल होणाऱ्या जोडीदाराला खर सांगितल तरी खूप प्रॉब्लेम असतो. आसो
आपलं नशीब फुटकं नाही. पण डेंजर आहे. शाळेमध्ये असल्यापासून मला प्रेमात पडायची खूप बेक्कार सवय आहे. शाळेतला क्रश नंतर कॉलेजमधला क्रश. पण हे प्रेम समोरून नसायचं. ते फक्त माझ्याकडूनच असायचं. एकतर्फी. त्यातच मी वाहून जायचो. डेरिंग करून मी एकीला प्रपोज हि केला. ती बया म्हटली 'मी कोण आहे माहितीय ना तुला? या एका वाक्यानं तीच्यातली आणि माझ्यातली आर्थिक आणि सामाजिक दरीच दाखवून दिली न राव.
मुंबईला शिकायला आल्यावर ही असचं क्रश व्हायचं. त्यातली एक खूपच आवडायला लागली म्हटलं तिच्यासोबत तर लग्न करता येईल म्हणून सुरुवातीला तिच्या सोबत मैत्री केली. वर्ष दिड वर्ष तिच्यासोबत बोलत राहिलो. तिला विचारलं. ती बोलली 'तू माझा मित्र आहेस. तुझ्याबद्दल माझ्या मनात काहीही नाही.' पुन्हा सारं बारगळल.
ती नाही म्हटल्यावर बरेच दिवस मुली पाहण्याच्या कार्यक्रम थांबवला होता. आता आई हात धुन मागे लागलीय. पुन्हा मुली पहायला सुरुवात करावी लागणार आहे. तिला या वर्षा अखेरीस माझं लग्न करायचच आहे. खर तर माझी आई modern विचारांची असती तर मी लग्न न करता रिलेशन मध्ये राहणं पसंत केलं असतं. किंवा Contract marriage केलं असतं. पण माझी आई एवढ्या modern विचारांची नाहीय. ती अपेक्षा हि मी करू शकतं नाही. हा सारा माझा Background.
मी आता लग्नासाठी मुलगी शोधतोय. एकुलता एक असल्यान घरच्यांसाठी मला लग्न करणं गरजेच वाटतय. मी फ्रीलान्स फिल्ममेकिंग चं काम करतोय. पार्टनर कडून माझ्या मापक अपेक्षा आहेत. शिक्षित, समजूतदार असावी.देवधर्म करण्यापेक्षा माणुसकी जपणारी असावी. लग्नानंतर बायको म्हणून न राहता मैत्रीण म्हणून रहवी. माझ्या इतकच तेवढच तिला हि स्वातंत्र्य मिळेल. आणि हो मी जेवण बनवायला शिकतोय. वेळ मिळेल त्या वेळी जेवण हि बनवलं जाईल. जातीची अट नाही. other cast हि चालेल. मग शोधताय ना.

- के.प्रफुल्ल

Tuesday, 29 January 2019

जात आणि वास्तव

आजवर देशभरात उच्च वर्णिय बहुसंख्यांका कडून दलित अल्पसंख्यांकावर अन्याय अत्याचार होत आले आहेत. खैरलांजी - जवखेडा ते खर्डा पर्यंत आणि त्या अगोदर ही महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर संपुर्ण गाव एकत्र येऊन दलित समाजाला वाळीत टाकण्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या आहेत. सांगली जिल्ह्यातल्या बोरगावमध्ये सवर्णांनी दलितांची कुटूंब उध्दवस्त केल्याची घटना ही आपण जवळून पाहिली आहे. उच्चवर्णीयांकडून दलितांच शोषण केल्याच्या घटना या पुरोगामी महाराष्ट्राला नव्या नाहीत. अश्यावेळी जिल्ह्यात पुन्हा एक घटना घडते. ही घटना दलित आणि इतर मागासवर्गीय कुटूंब,आणि त्यांनी वर्षानुवर्षे थाटामाटात सजवलेला संसार सारं काही मोडून काढते.
         सांगली जिल्ह्यातील माळवाडी गावात गेल्या वीस पंचवीस वर्षापासुन अतिक्रमण केलेल्या जागेवर दलित व इतर मागासवर्गातील लोक रहात असून शासन निर्णयानुसार ती जागा त्याच्या नावाने रितसर करुन देणे आवश्यक आहे,अशी मागणी त्या जागेवर राहणारे लोक कित्येक दिवस करत आहेत. पण गावातल्या सवर्णांना दलित इतर मागास लोकांनी शिक्षण, उद्योग, व्यवसायात केलेली प्रगती आता पहावेनाशी झाली आहे असे दिसते आहे. "रोज सकाळी उठल्यावर आंम्ही यांचच तोंड पहायचं का"? असं गावातल्या पुढाऱ्यांबरोबर उच्चवर्णीय लोकांना वाटतय. यांच्या झोपड्या इथून काढून टाका असं त्या ठिकाणी राहणारे उच्चभ्रु उच्चवर्णीय लोक, गावातले पुढारी म्हणत आहेत. त्यांच्या डोक्यावरचं छंप्पर काढण्यासाठी संपुर्ण गाव खांद्याला खांदा लावून एकत्र होतय. ही घटना सांगली जिल्ह्याला आणि पर्यायाने सबंध महाराष्ट्राला शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे.
         खरचं जातीवाद संपला आहे का? की बदलत्या काळासोबत वेगळा चेहरा आणि वेगळ्या एडव्हान्स विषयांना घेऊन परत तोच संघर्ष उभा करावा लागणार आहे. छ. शिवाजी फुले शाहू आंबेडकर यांनी जातीयता संपवण्यासाठी आपलं  सारं आयुष्य पणाला लावल. स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही मुल्ये समाजात रुजवून बाबासाहेबांनी लोकशाहीवादी भारतात निर्माण केला. पण खऱ्या अर्थाने देशातली लोकशाही यशस्वी ठरली आहे का? सर्व नागरिकांमध्ये समानता असावी त्यांना कायद्यामध्ये समानता असावी. महत्वाचं म्हणजे बहुसंख्यांकाचा अल्पसंख्यांकावर अत्याचार नसावा. तर ही लोकशाही खऱ्या अर्थाने यशस्वी होईल. असं बाबासाहेबांचा लोकशाहीवाद सांगतो.
ज्या शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना सोबत घेऊन स्वराज्याची निर्मिती केली. ज्या महात्मा फुल्यांनी स्पृश्य-अस्पृश्य न पहाता सर्वाना पिण्याच्या पाण्याची सोय करुन दिली. ज्या बाबासाहेबांनी जातीवाद नष्ट करुन समतेचे बिज रोवले त्यांच्या या पुरोगामी महाराष्ट्रातील अनेक गावं आज ही जातीवादाच्या जबरी विषाने रोज होरपळले जात आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळून 60 वर्षे झाली आहेत. तरी देखील या देशातल्या दलितांवर, शोषितांवर गावखेड्यापासुन ते मोठमोठ्या शहरापर्यंत अन्याय अत्याचार होतचं आहेत. यावेळी मात्र मला आठवते, ती नामदेव ढसाळांच्या कवितेची ओळ 'स्वातंत्र्य कुठल्या गाढवीचं नाव आहे'.
                                                                                                           ©प्रफुल्ल कांबळे